ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही विशेष आहे त्यांच्याशी ईर्षा न करता, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही कमी आहे त्यांचा अवमान न करता आणि जे आपल्याशी समान आहेत त्यांच्याशी स्पर्धा न करता तू जगामध्ये श्रेष्ठत्वाकडे गेलास…
- मातृचेटकृत बुद्धस्तोत्र
मनोरंजनाचं क्षेत्र कोविडनंतर संकटात सापडलं. अजुनही त्यात फ़रक पडलेला नाही. प्रेक्षक चित्रपटगृहांकडे येत नाहीत. भारतात २०१९ मध्ये १४३ कोटी (footfall) प्रेक्षक चित्रपट गृहांत आले होते. २०२३ मध्ये ही संख्या ९० कोटींवर आली. आपल्या अर्थववस्थेच्या स्थितीचं हे एक निदर्शक रूप. ख़िशांत अतिरिक्त पैसे असले की, लोक मनोरंजनावर खर्च करतात. तेच कमी झालं. गुगल, यु ट्युब, फ़ेसबुक, इन्स्टा, ई कॉमर्स या प्लॅटफॉर्मकडे जाहिरातदार वळलेत. त्याचा फटका देशातल्या दूरचित्रवाणी व्यवसायाला बसलाय. गेल्यावर्षी या डिजिटल पलॅटफॉर्मला ४३ हज़ार कोटी रूपयांचं जाहिरातींचं उत्पन्न मिळालं, तर देशातील दूरचित्रवाणी उद्योगातील सर्व वाहिन्यांचं उत्पन्न ३६ हज़ार कोटींवर आलं. याचा परिणाम चित्रपट निर्मिती व वितरण व्यवस्थेवर झाला आहे, निर्मिती कमी होते आहे. जाहिरातींचे उत्पन्न घटल्याने दूरचित्रवाणी मालिकांची संख्या कमी करून खर्च वाचवण्याकडे वाहिन्यांचा कल आहे. परिणामी निर्मिती व्यवस्थेतील अर्थकारण कोलमडते आहे, ज्याचा थेट परिणाम रोजगारावर झाला आहे. मुंबईत मार्केट आहे, त्यामुळे मनोरंजनाचा उद्योगही आहे; परंतु सरकार कोणत्याही पक्षाचे असो, photo opportunity पलिकडे या उद्योगाच्या समस्यांकडे राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. १९७७ साली दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईत, गोरेगाव येथे सुरू झाली. पण त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सरकारने एका चौरस फुटाच्याही पायभूत सुविधांची उभारणी या उद्योगासाठी केलेली नाही. तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे १९९० नंतर हा उद्योग मुंबईत विस्तारला. पण त्यात राज्य व केंद्र सरकारचे योगदान शून्य. आणि आता अर्थव्यवस्थेतील मंदीची झळ या उद्योगाला बसते आहे.
सोबतचे छायाचित्र आजच्या ‘मटा’तलं. निवडणुकांच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील जाणकारांना बोलावुन घडविलेली चर्चा व त्या क्षेत्राचा जाहीरनामा, असं या कार्यक्रमाचं स्वरूप. त्यात मनोरंजन उद्योगाच्या चर्चेत सहभागी होता आलं. त्यात मी मांडलेले हे मुद्दे. बाकीच्या मान्यवरांचे मुद्दे वृत्तांतात आहेतच.